राष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन!
आज दि. १७ जून २०१३. अगदी आजच्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाऊ शहाजिराजे भोसले या वीर मातेचे निधन झाले. आज त्या घटनेला बरोबर ३३८ वर्षे झालित. मला जिजाऊ बद्दल अत्यंत आदर असून भारतीय इतिहासात एक सोनेरी पान कोरणारी ही वीर माता मला सदैव पुज्य नि वंदनीय राहिली आहे. आज त्यांचा स्मृतीदिन, त्या निमित्ताने मी या वीर मातेला विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राचा इतिहास जेंव्हा केंव्हा चर्चिला जातो तेंव्हा तो शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही हे वास्तव आहे. जगात असे अनेक शूर वीर होऊन गेलेत की त्या देशाचा इतिहास त्यांच्या शिवाय चर्चीला जाऊ शकत नाही. यातली काही गिनीचुनी नावं घायचीच म्हटल्यास नेपोलियन, अब्राहम लिंकन, नेलसन मंडेला ते अगदी गांधी अशी मोठी यादी मांडता येते. वरील नेत्यांच्या कर्तुत्वाचं बारीक निरिक्षण केल्यास सैनिकी कर्तबगारी ते अंहिसेचा लढा विविध क्षेत्रातील दिग्गजांची ही यादी बनते. पण या सर्वांच्या बाबतीत शिवाजी महाराज निराळे ठरतात ते म्हणजे वरील पैकी एकांच्याही आईचा त्यांच्या कर्तबगारीशी थेट संबंध जोडून इतिहास सांगितला जात नाही. मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास मुळात सुरुच होतो त्यांच्या आईच्या म्हणजेच "जिजाऊच्या" कर्तबगारी नि स्वाभिमानी कर्तुत्वातून. शिवाजी महाराज जगातले एकमेव असे कर्तबगार पुरुष आहेत ज्यांच्या कर्तबगारीचं व त्यांच्या आईचं इतिहासांनी तेवढ्याच सन्मानाने स्वागत केलं नि सन्मान बाळगला आहे. शिवाजी महारांची थोरवी गाताना जिजाऊचं स्थान कायमच त्या थोरविचा पाय म्हणून गौरविला जातो आहे. त्याच बरोबर महाराजांनी मिळविल्या प्रत्येक यशाची पायाभरणी जिजाऊच्या शिकवणीत होती हे इतिहासांनी मोठ्या मनाने स्विकारत येणा-या पिढयांच्या हृदयात ते कोरण्याचं काम बाजवलेलं आहे. तर जिजाऊची अशी ही मुलख वेगळी ओळख. जिजाऊचा आवाका सामान्य माणसाच्या वैचारीक कक्षेपलिकडचा.
...म्हणून जिजाऊ माझ्यानजरेतुन.
या देशातील इतिहासात(इतिहास म्हटलं, पुराणं व भाकडकथात नाही) अजरामर झालेल्या काही मोजक्या स्त्रीया म्हणजे महामाया, गौतमी, खेमा, जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई आणि रमाई. या सगळया अस्सल ऐतिहासिक स्त्रीया असून हे जग अस्तित्वात आहे तोवर या महान स्त्रीयांचा इतिहास येणा-या पिढ्यांना कायमच मार्गदर्शक तर ठरेलच पण आतून एक तेजस्वी उर्जा भरण्याचे काम करीत राहील. आमच्या जिवनात स्त्रीचं महत्व अनन्यसाधारण असतं, फक्त डोळे उघळे ठेवून त्याचं अवलोकन करावं लागत. हे अवलोकन नीट केल्यास आपल्यास एकून कर्तबगारीत स्त्रिचा वाटा अर्धा वा समसान असतो याची जाण होते. वरील सर्व स्त्रीयांच असच योगदान होतं. व त्यातून घडलेल्या भारतीय समाजात जो बदल होत गेला त्या बदलाच्या मुळाशी ख-या अर्थाने या स्त्रीयांनी रुजविलेलं मुल्ये होते. वरील तमाम स्त्रीयांबद्दल मला अत्यंत आदर असून त्या सर्व माझ्यासाठी वंदनीय आहेत. पण जिजाऊ मात्र अगदी स्पेशल आहेत.
जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत आहे:
जिजाऊ बद्दल बोलायचं म्हटल्यास त्या मला अगदी माझ्या रक्ताच्या व नात्याच्या वाटतात. एवढच नाही तर मला त्या माझ्या पुर्वज वाटतात. त्यांच्यी नीती, धोरण, बाणेदारपणा नि चिकाटी पाहता तर त्या माझ्याच घरातल्या माता-बहिणीशी सुसंगत अशा पुर्वज आहेत असं वाटतं. अशा कित्येक घटना आहेत ज्यामुळे जिजाऊचं व माझं काहितरी रक्ताचं नातं आहे असं मला सारखं वाटायचं. अन जेंव्हा मी पहिल्यांदा सिंदखेडराजाला जिजाऊ जन्मोत्सवास गेलो तेंव्हा मात्र अवाक झालो. कारण जिजाऊंचा म्हणजेच जाधवांचा वाडा हा महारवाड्या जवळ आहे. महारवाडा हा गावाबाहेर असायचा व आजही असतो. मग मला पहिला प्रश्न पडला की जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत कसं काय असू शकतं? म्हणजेच जिजाऊंचा व महारांचं काहितरी नक्कीचं जवळचं नातं असावं. मधे तीन-साडॆतीनशे वर्षाचा काळ भुर्रकन उडून गेला. मधल्या काळात संशोधकानी व इतिहासकारानी अत्यंत संशयास्पद लिखान करुन त्याना हवा तसा इतिहास निर्माण करुन ठेवला आहे. त्यामुळे जिजाऊच्या वाड्याचे हे रहस्य कधी उलगड्णार की नाही माहित नाही. पण उभा असलेला वाडा मात्र एक मूक संदेश देतो आहे तो म्हणजे जिजाऊ ह्या बौधांच्या अत्यंत जवळच्या होत्या. ते नातं नेमकं कसं होतं हे मात्र उलगडत नाही. पण जवळचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
सगळे जाधव बौद्ध आहेत:
या सिंदखेडराजाची आजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी जिजाऊचा संबंध थेट माझ्याशी जोडून जाते, ती म्हणजे जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे बहुतांश जाधव हे मराठा नसून बौद्ध (महार) आहेत. एक दोन अपवाद असतीलही पण ते तेवढ्या पुरतच. सगळे जाधव महाराच कसे? हा प्रश्न अनेक गूढ पोटात दडवून आहे. म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय? ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघड आहे. कारण मधला तीन-साडेतीन शकताचा काळ म्हणजे खूप मोठा प्रवास होय. यात इतिहासाची अनेक पानं जळून खाख झालीत, वास्तव गुदमरुन गेलं. आणि विशिष्ट वर्गानी लिहलेल्या इतिहासातून दिसणारी आजची माहिती ही संपूर्ण एकतर्फी नी वास्तवा पासून फारकत घेणारी आहे. पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत ते म्हणजे वाड्याची जागा नि जाधव बौद्ध असणे. या दोन गोष्टी दडलेल्या इतिहासाला तर्काच्या आधारे खोदण्यासाठी खुणावत आहेत.
जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही. वरील दोन जिवंत पुरावे पाहता जिजाऊ माझ्या आहेत असे आतून वाटते. कोणी स्विकारो वा नास्विकारो... जिजाऊ ह्या माझ्या पुर्वज आहेत व त्यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. या माझ्या मायेने शिवराय घडवला. भारतीयाना ताठ मानेने जगणे शिकविले. प्रत्येक माणसात स्वाभिमान जागविला. संशोधन होऊन आज ना उद्या दोन्ही गोष्टींचा उलगडा होईल तेंव्हा होईल. पण आजच्या घटकेला वरील दोन्ही गोष्टी मझी नाड जिजाऊशी जोडून जातात.
शंका अशी आहे की एकतर हे दोन्ही समाज समान दर्जाचे असावेत किंवा एकच असावेत असे वाटते. किंवा मग फार फार तर अस्पृश्यता आजून उग्ररूप धारण करायची होती. व ते असे असल्यास जिजाऊ नि माझा समाज हे नक्कीच एकाच समाजाचा भाग असावेत. म्हणजे लॉजिकली याचा विचार केल्यास तमाम महार हे मराठा किंवा आजचे मराठे हे तेंव्हाचे महार किंवा महार व मराठा हे एकच समाज होते असं निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला जातीय कसोटी न लावता अधिक व्यापक बनवायचे झाल्यास जिजाऊ नि महार हे दोन भिन्न समाज नसून एकाच समाजाचे होते असेही म्हणता येईल. मग तो समाज मराठा की महार हे ज्यांनी त्यानी ठरवायचं. काय असेल ते असेल. पुढे शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून हिनविणे हे सुद्धा जिजाऊचं माझ्याशी असलेला थेट संबंध अधोरेखीत करतोच. फक्त त्यातील फरक किती ते शोधून काढणे संशोधनाचा विषय आहे. तरी जिजाऊचं व बौद्धांचं(पुर्वाश्रमिच्या महारांचं) संबंध मात्र थेट जुडणारं असून मी स्वत:ला त्या वीर मातेचं रक्त समजतो. तमाम मराठी माणसांची ती जिजाऊ... तिला मी विनम्र अभिवादन करतो.
जय जिजाऊ.
No comments:
Post a Comment